Sunday, 22 July 2018

"निद्रानाश" म्हणजे रोगाला आमंत्रण

           अतिव्यस्त आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे अनेकांना झोप पूर्ण न होण्याच्या तक्रारी सुरू आहेत. त्यात अति विचार, अति मानसिक ताण, अति चिंता या कारणाने रात्री झोप न लागणे आणि परिणामी आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होणे याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. बऱ्याच संकटांवर मात करत आपण प्रत्येकजणचं या व्यावहारिक विश्वात संघर्ष करत आहोत. गरज नसलेला ताणतणाव, चिडचिड, अतिसहनशीलता, अतिविचार या गोष्टींमुळे मानसिकरित्या आपण कमकुवत होत चाललो आहोत. त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो, पुन्हा जास्त तणाव निर्माण होतो त्याचा झोपेवर परिणाम होऊ लागतो, पुन्हा चिडचिड सुरु होते आणि परिणामी निद्रानाशामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो, मग हे विचित्र कालचक्र सुरुच रहात. या कालचक्रातून बाहेर पडायचं असेल तर तणावमुक्त जीवन जगून पुरेशी शांत झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. या आरोग्याला घातक निद्रानाशापासून मुक्त व्हायचं असेल तर खालील पथ्यापथ्य पाळावीत.

★ काय करणे टाळावे -

● झोपण्यापूर्वी अति मसालेदार आणि अति जेवणे टाळावे.

● रात्री उशिरा जेवणे टाळावे.

● रात्री झोपायच्या आधी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे

● थंड गरम एकत्र खाऊ नका.

● झोपेच्या गोळ्या खाणे शक्यतो टाळावे. जर काही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या सुरू ठेवाव्यात.

● सतत अल्पकाळ झोप घेणे टाळावे.

● झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे.

● व्यसनापासून लांब राहावे.

★ काय करावे -

● जेवण वेळेवर करावे.

● झोपायच्या आधी कोमट पाण्याने अंघोळ करावी.

● झोपताना मोबाईल दूर ठेवावा.

● डोळ्यावर पट्टी बांधून झोपावे.

● सकाळी उठण्याच्या आणि रात्री झोपण्याच्या वेळा निरंतर एक सारख्या असाव्यात.

● दिवसभर जर आपण सतत ऍक्टिव्ह राहिलो तर रात्री आपोआप छान झोप लागते.

● झोपण्यापूर्वी डोक्याला आणि तळपायाला तेलाने मसाज करावे.

● म्युसिकची आवड असेल तर रात्री झोपताना हळू आवाजात मनाला आवडेल असेल म्युसिक ऐकावे.

● कोमट पाण्यात एक लिंबू आणि एक चमचा मध मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यावे आणि रात्री जेवणानंतर प्यावे.

● नियमित २० मिनिट ध्यान करावे. २० मिनिटांच्या ध्यानाने ८ तासाच्या झोपेएवढा आराम मिळू शकतो.

● झोप लागण्यासाठी अॅक्यूप्रेशर थेरपीचा आपण उपयोग करू शकतो - रात्री झोपेच्या वेळी उजव्या हाताच्या करंगळीच्या खालच्या उंचवट्यावर डाव्या हाताच्या अंगठ्याने ५ मिनिट मसाज करत राहावे. शांत झोप लागते.

● रात्री झोपेच्या वेळी १० ते १ अशा उलट्या क्रमाने झोप येईपर्यंत अंक मोजत राहावे.

★ कोणाला किती तास झोप पुरेशी आहे? -

● ६ ते ९ वयोगटासाठी - १० ते १२ तास झोप आवश्यक आहे.

● ९ ते १८ वयोगटासाठी - ८ ते १० तास झोप आवश्यक आहे.

● १८ ते ६४ वयोगटासाठी - ६ ते ८ तास झोप आवश्यक आहे.

● ६५ च्या पुढील वयोगटातील व्यक्तींची झोप निसर्गतःच कमी होत जाते.

          आपण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती तर केली पण आज याचं तंत्रज्ञानामुळे आपल्या झोपेचे नियंत्रण राहिलेले नाही. आपल्या वाट्याला आधीच मोठा संघर्ष असताना या तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करत आहारी जाऊन आपण आपली अमूल्य अशी झोप अस्ताव्यस्त करत आहोत. आजकालच्या तरुणाईमध्ये अति प्रमाणात चिंता करणे, मानसिक ताण घेणे ही निद्रानाशाची कारणे ठरत आहेत. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री नियमित सात-आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. नाहीतर हा "निद्रानाश" म्हणजे रोगाला आमंत्रण ठरेल.

टीप - वरील पथ्यापथ्य सर्वसाधारण आहेत यात आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बदल होऊ शकतो. निद्रानाशावरील उपचाराच्या योग्य उपायांसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, 3 July 2018

“भार”ग्रस्त नको भारदस्त बनूया......


          “कृश नको, क्रिश बनायचंय” या माझ्या मागील लेखात अति कृश व्यक्तींसाठी वजन वाढविण्यासंबंधी मी काही महत्वाच्या टिप्स दिल्या होत्या. या लेखात अति वजन वाढलेल्या व्यक्तींसाठी वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. मागचा लेख पोस्ट केल्यानंतर हजारो प्रतिक्रिया आल्या पण गमतीचा भाग म्हणजे त्यातल्या निम्म्याहून जास्त प्रतिक्रिया या “वाढलेलं वजन कमी करायचा उपाय सांगा डॉक्टर साहेब” अशा प्रकारच्या होत्या. बऱ्याच लोकांना वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून चांगला उपाय हवा आहे. पण मित्रांनो वजन कमी करणे आणि आरोग्य नीट ठेवणे ही काही जादू नाही की लगेच उपाय सांगितला आणि तो केला की पटकन वजन कमी झालं असं होणे शक्य नाही. वजन कमी करायचं असेल आणि पुढच्या काळात ही ते नियंत्रित ठेवायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपली जीवन शैली, आपली दिनचर्या बदलायला हवी. कारण आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून अगदी चुकीची करून टाकलीय. वजन कमी करण्यासाठी फक्त आहार कमी करून उपयोग नाही तर आपली पूर्ण दिनचर्याच बदलावी लागेल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतचा योग्य दिनक्रमच ठरवला गेला पाहिजे. हा दिनक्रम प्रत्येकाच्या वयानुसार, वजनानुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळा असू शकतो. मी येथे फक्त सर्व साधारण मुद्दे मांडणार आहे.
          आपल्या सर्वांना “भार”ग्रस्त न होता आपलं व्यक्तिमत्व भारदस्त बनवायचं आहे. वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम जिभेचे लाड बंद करून योग्य पौष्टिक आहार आणि त्यासोबत योग्य तर्हेचा व्यायाम आणि योगासनं सुरु करायला हवेत. आपल्या आवडत्या खाण्यापिण्याच्या सवयी पासून लांब राहायला हवं. आम्हा डॉक्टरांकडे येणारे पेशंट किंवा नातेवाईकाकडून हमखास विचारला जाणारा प्रश्न, “वजन कमी करायचा उपचार किती दिवस घ्यावा लागेल आणि पथ्य किती दिवस पाळावी लागतील?” मला वाटत हा सगळा दिनक्रम, उपचार आणि पथ्य सुरु करताना हे काहीतरी आपण वेगळं करतोय असं मनात न आणता हा दिनक्रम आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि तो आपण आयुष्यभर नित्यनियमाने करायचा आहे ही खुणगाठच मनाशी बांधून घ्यायची आणि या गोष्टींची एक चांगली सवयच स्वतःला लावून घ्यायची. कारण आपलं वजन कमी करून जर भविष्यकाळातही नियंत्रित ठेवायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर ही दिनचर्या आयुष्यभर एक चांगली सवय म्हणूनच पाळली गेली पाहिजे.

वजन कमी आणि नियंत्रित करण्यासाठीचा दिनक्रम –

सकाळी उठल्यावर सौचास झाल्यावर किमान अर्धा तास व्यायाम करावा.
१. किमान २ किमी फास्ट चालावे. (भरपूर घाम येईपर्यंत)
२. रोज किमान १० सूर्यनमस्कार घालावे. शक्य असेल तर एक एक सूर्यनमस्कार २५ पर्यंत वाढवत जावे.
३. योगासने करावीत – भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, वक्रासन

व्यायाम झाल्यावर १० मिनिटांनी १ ग्लास कोमट पाण्यात अर्धा छोटा चमचा दालचिनी पूड, अर्धा मोठा चमचा मध आणि एक लिंबू पिळून ते मिश्रण उपाशीपोटी प्यावे.

आपल्या नेहमीच्या दैनंदिनी नुसार आपण सकाळी भरपूर नाष्टा करतो नंतर दुपारी पोटभर जेवण आणि रात्री चमचमीत मसालेदार पोटभरून खातो. पण आता वजन कमी करायचे असेल तर जिभेचे लाड करणारे मसालेदार, चटकदार, तुपकट, तेलकट आणि गोड पदार्थ बंद करावे लागतील. आणि २ वेळच्या जेवणाएवढाच आहार सोयीनुसार आणि वेळेनुसार विभागून थोडा थोडा ४ वेळा करावा.

वजन कमी करण्यासाठी काय खाणे टाळावे? -

१. मांसाहार करू नये.
२. दुध आणि दुधाचे पदार्थ खाऊ नये.
३. बेकरीचे पदार्थ खाऊ नये आणि जास्त प्रमाणात शीतपेयाचे सेवन करू नये.
४. जेवणात मीठ कमी खावे.
५. गोड पदार्थ खाऊ नयेत.
६. जास्त कार्बोहायड्रेट असणारे आणि चरबी वाढविणारे पदार्थ साखरबटाटा आणि तांदूळ या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जे की इन्सुलिन निघण्याच्या प्रक्रियेला उत्तेजित करतात. इन्सुलिन शरीरातील फॅट स्टोरेज हार्मोन असतं. जेव्हा इन्सुलिनची मात्रा कमी असते, तेव्हा शरीरात जमा झालेलं फॅट बर्न व्हायला सुरूवात होते.

वजन कमी करण्यासाठी काय खावे? -

१. प्रत्येक जेवणापूर्वी वरणाचे नुसते कोमट पाणी प्यावे.
२. काकडी, गाजर, कोवळा मुळाटोमाटोबीट,कांद्याची पातगोबीची कोंशिबीर खाल्ले तर उत्तम राहील. पत्ता गोबी मुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होऊन चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
३. चहा किंवा दुध प्यायचंच असेल तर साय काढलेले दुध घ्यावे.
४. घरी तयार केलेले दही नियमित सेवन करावे.
५. मध एक कॉम्प्लेक्स साखर आहे जे वजन कमी करण्यासाठी मदत करते. रोज सकाळी वर सांगितल्याप्रमाणे मधासोबतचे मिश्रण उपाशीपोटी प्यावे.
६. संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर अर्ध्यातासानी एक छोटा चमचा त्रिफळा चूर्ण आणि एक मोठा चमचा मध व्यवस्थित मिसळून त्याचे चाटण करावे. आणि त्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून ते मिश्रण प्यावे.

काही लोक खूप घाईघाईत जेवतात. ती सवय खूप वाईट आहे. जुनी लोक सांगायची की एक घास ३२ वेळा चावून खायला हवा. त्याचा उद्देश एवढाच असायचा की आपण योग्य पद्धतीने चावलेल्या अन्नातून तयार झालेला अन्नरस आपल्या शरीराला मिळावा. जो अन्न रस आपल्या जिभेच्या खालील रसवाहीन्यातून शरीराचे योग्यरीत्या पोषण करतो. आपण घाईघाईत खाल्ल्यामुळे अन्नरस तर मिळत नाहीच पण पचनक्रिया सुद्धा बिघडते. भूक लागली की आपण घाईघाईत जेवण करून फक्त पोट भरण्याचा प्रयत्न करतो. पोटभरून न जेवता मनभरून जेवायला हवं.

जेवणाच्या योग्य वेळा ठरवाव्या आणि त्याच वेळेला जेवून घ्यावं.

 रात्री झोपण्यापूर्वी थंड पाणी न पिता गरम किंवा कोमट पाणी (सुखोष्ण जल) प्यावं. यामुळं पोटाच्या समस्या बंद होतात आणि जास्तीचं फॅट बर्न होतं. 

दिवसा न झोपता रात्रीची पूर्ण झोप घ्या. पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे ध्यान करावं, आनंद देणारं संगीत ऐकावं, गरम पाण्यानं आंघोळ करावी. त्यामुळं चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त फॅट बर्न होतं. व्यवस्थित झोप झाल्यामुळे शरीरातील हार्मोन कंट्रोल मध्ये राहतात, त्यामुळं सतत भूख लागत नाही आणि शरीरातील उर्जाही कमी होत नाही.

◆ आणि सर्वात महत्वाचं पथ्य – स्वतःवर प्रेम करा, स्वतःचे लाडके बना. Love Yourself. कारण आपणच आपला लठ्ठपणा स्वीकारला तर मनातली चिंता थांबते. आणि अशा मनस्थितीमुळे वजन कमी करण्याकडे जास्त मन गुंतते आणि केलेले उपाय जास्त परिणामकारक होऊन वजन कमी करण्यास मदत होते.

टीप – मी या लेखात सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण आहेत. आपल्या प्रकृतीनुसार, सवयीनुसार आणि काम करण्याच्या पद्धतीनुसार यात बदल होऊ शकतील. आणि या व्यतिरिक्त ही बऱ्याच उपायांद्वारे वजन कमी करता येऊ शकते पण मी येथे फक्त त्यातले काही मुद्दे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

एक विनंती – आपण दुसऱ्याशी तुलना करणे बंद केले पाहिजे. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, शरीर बांधणी वेगळी आहे. त्यामुळे वजन कमी करण्याचे उपाय केल्याने त्याचा प्रत्येकावर होणारा परिणाम वेगवेगळा असू शकतो, अनुभव वेगळा असू शकतो. म्हणून आपल्या अनुभवाची तुलना दुसऱ्याच्या अनुभवाशी करणे चुकीचे आहे. आपण संयम ठेवला पाहिजे कारण कोणताही उपाय म्हणजे जादूची कांडी नसते. मी स्वतः हे उपाय करून माझं वजन कमी केले आहे. १२ डिसेंबर २०१७ ला माझं वजन ८२.२ किलो होत आणि आज ३ जुलै २०१८ रोजी ७१.९ किलो झाले आहे. आपली दैनंदिनी योग्य पद्धतीने बदला, हळूहळू खूप चांगला परिणाम जाणवेल. चला तर मग “भार”ग्रस्त नको भारदस्त बनूया......

-  डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Tuesday, 22 May 2018

"कृश नको क्रिश बनायचंय......"


          वैद्यकीय व्यवसाय करत असताना रुग्णांकडून बरेच गमतीशीर अनुभव ऐकायला मिळतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करून कंटाळलेले असतात तर काही लोक वजन वाढावं म्हणून मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून वेगवेगळ्या मजेशीर टिप्स घेत असतात. मागे एकदा माझ्या कडे आलेला एक रुग्ण मला गमतीने म्हणाला होता की "कृश नको क्रिश बनायचंय......" काही तरी उपाय सांगा त्यासाठी. माझ्या कडे येणाऱ्या रुग्णांत आणि माझ्यात अशा बऱ्याच गमती जमती नेहमीच सुरू असतात. त्यामुळे रुग्ण ही रिलॅक्स होतात आणि मी ही...... निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी मानसिकरित्या रिलॅक्स राहणं जास्त महत्वाचं आहे. लोकांमध्ये हाही एक मोठा गैरसमज आहे की, खूप खाल्ल की वजन वाढत आणि उपवास केला की वजन कमी होत. खुप खावून किंवा उपवास करून वजन वाढवता किंवा कमी करता येत नसत तर हे आपल्या शरीरातल्या पचन क्रिया आणि चयापचय क्रियेवर अवलंबून असत. उलट उपवास केल्याने जठराला विश्रांती मिळते आणि पचन क्रिया आणि चयापचय क्रिया उत्तम राहण्यास मदत होते परिणामी आहार वाढतो आणि वजन ही वाढू शकत. अति वाढलेलं वजन आणि अति प्रमाणात कमी असलेलं वजन दोन्ही आपल्या आरोग्यासाठी घातकच आहे. जे आपल्या कमी वजनामुळे आणि वाळलेल्या शरीरयष्टीमुळे स्वतःच्या मना मध्ये न्यूनगंड बाळगून आहेत अशा लोकांसाठी आज काही अगदी सोप्या घरगुती टिप्स आणि पथ्ये मी सांगणार आहे की ज्या पाळल्यानंतर त्यांचे वजन वाढण्यास मदत होईल. वजन वाढणे म्हणजे नुसतं पोट वाढणे नव्हे आणि नुसतं पोट वाढणे म्हणजे वजन वाढणे नव्हे. आणि हे लक्षात घ्या वाढलेलं पोट हे आजाराच माहेर घर असतं. फक्त पोट न वाढता संपूर्ण शरीराचं समतोलीत वजन वाढलं पाहिजे.

वजन वाढवण्यासाठी १० अगदी सोप्या टिप्स आणि पथ्ये

१. तेलाभ्यंग – आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने मालिश करून घ्यावी.

२. व्यायाम नियमित करावा. रोज सूर्यनमस्कार घालावा आणि रोज एक सूर्यनमस्कार वाढवत जावे.

३. व्यायामानंतर मुठभर कच्चे शेंगदाणे आणि गुळ खावा.

४. दोन्ही जेवणाच्या आधी अर्धा तास आल्याचा छोटासा तुकडा मीठ लावून चावून खावा.

५. आहार गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट असा षडरसात्मक असावा. त्यात गोड पदार्थ जास्त खावेत.

६. रात्री ८ तास निवांत आणि शांत झोप घ्यावी. दुपारी १५ ते २० मिनिटे झोप घ्यावी. कारण दुपारच्या झोपीमुळे शरीरातील ऊर्जा कमी खर्च होऊन वजन वाढण्यास मदत होईल. 

७. कॅलरीजयुक्त अन्न (ड्रायफ्रुटसबदाममनुका) रोजखावे आणि प्रोटीनयुक्त अन्न (मासे, अंडीमोड आलेले चणेचिकनभातदूध आणि दुधाचे पदार्थमेवा) पदार्थांचे आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.

८. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारात पनीरलोणी तसेच तूपाचा समावेश करावा.

९. जेवताना कच्च्या हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. त्यामुळे तुमचे आरोग्यही सुधारते आणि विनातणाव तुम्ही वजन वाढवू शकता. 

आणि सर्वात महत्वाचं पथ्य

१०. तणावमुक्त रहा, भरपूर हसा आणि आनंदी रहा.

टीप - वरील पथ्य पाळताना आपल्या प्रकृतीनुसार योग्य/अयोग्य गोष्टीचा सल्ला आपल्या डॉक्टरांकडून घ्यावा. पुढच्या लेखात मी वजन कमी करण्यासाठी उपाययोजना सांगणार आहे.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Monday, 30 April 2018

“मुळव्याधापासून कायमची सुटका”


          माझ्या मागील लेखात आपण बहुगुणकारी जवस बद्दल माहिती वाचलीत. आज मी तुम्हाला मुळव्याध या त्रासदायक आजारातील काही महत्वाची पथ्य सांगणार आहे. जे तुम्ही सहजरित्या घरी करू शकता. माझ्या हॉस्पिटल मध्ये मुळव्याध या आजारासाठी मी स्वतः एक आयुर्वेदीक औषध तयार केलं आहे. ज्याचा वापर केला तर कोणत्याही शस्त्रक्रियेविना “मुळव्याधापासून कायमची सुटका” होऊ शकते. त्यासोबत प्रकृतीनुसार योग्य पथ्य पाळली तर या आजारातून लवकर मुक्त होता येत.

          मित्रांनो, हा आजार असा आहे की कोणी कोणाला सांगूही शकत नाही आणि लपवू ही शकत नाही. यात होणाऱ्या वेदना असह्य असतात. काहींना तर बसायला सुद्धा त्रास होतो. खरतर या आजाराच मुख्य आणि एकमेव कारण हेच आहे की आपण आपल्या प्रकृतीनुसार दिनचर्या अजिबात पाळत नाही. आपले खाणे, पिणे, फिरणे, झोपणे, व्यायाम हे सर्व प्रकृतीनुसार असायला हवे. पण तसे न करता आपण आपली दिनचर्या विकृत करून टाकली आहे. त्याच्या परिणामी आज बऱ्याच जणांना मुळव्याधीचा त्रास उदभवतो आहे. या त्रासामुळे पचन क्रिया आणखी बिघडून आपल्या शरीरातील महत्वाची अशी चयापचय क्रिया मंदावते आणि वेगवेगळ्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागतो. आपण वेळेत सावध झालो तर पुढच्या होणाऱ्या त्रासापासून लांब राहू शकतो. आज काल मूळव्याधासाठी एक म्हण प्रचलित झाली आहे...... जिभेचे चोचले, बुडाला टोचले...... विनोदाचा भाग सोडला तर आपण खरच जिभेचे अति लाड करत आहोत म्हणूनच मुळव्याधासारखा आजार आपल्या शरीरात घर करतोय. याला बाहेर काढण्यासाठी सर्वप्रथम तुमचा आहार, विहार किती आणि कसा असावा हे तुमच्या डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन योग्य दिनचर्या तयार करा. तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या वयानुसार आणि प्रकृतीनुसार योग्य ते मार्गदर्शन करतील. आणि तुमच्या प्रकृतीनुसार जी पथ्य आहेत ती तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय अजिबात करू नका. आज काल whatsapp, facebook सारख्या social media वर काही आजारांविषयी पथ्य, आयुर्वेदिक औषधे याच्या पोस्ट असतात. पण याचा अंधपणे वापर करणं अतिशय चुकीचं आहे, कारण ही पथ्य किंवा उपचार तुमच्या प्रकृतीनुसारच असतील असं सांगू शकत नाही त्यामुळे काहींना फरक पडतही असेल पण काहींना उलटा परिणाम जाणवू लागतो आणि शरीरात अधिक गंभीर त्रास सुरु होतात. त्यामुळे अशा पोस्ट पासून दूर रहा आणि आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. मुळव्याध हा आजार फक्त योग्य पथ्य पाळून सुद्धा समूळ नष्ट होऊ शकतो. पण ही पथ्य योग्यरीत्या पाळली गेली पाहिजेत. अशीच काही सर्वांना म्हणजे सर्व प्रकृतीच्या आणि सर्व वयाच्या रुग्णांना उपयोगी अशी सर्व साधारण पथ्यापथ्य मी आज सांगणार आहे.

■ मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पाळावयाची अपथ्ये (अपथ्य म्हणजे हे करू नये) ■

• अति मद्यपान, धूम्रपान आणि जड पाण्याचे सेवन करू नये.
• गुटखा, तंबाखू खाऊ नये.
• पचायला जड आणि जळजळ करणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये.
• अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन करू नये.
• गाय, डुक्कर, बकरी, कोंबडी इ. प्राण्यांचे मांस सेवन करू नये.
• अनुचित व्यायाम व अति मैथुन कर्म करू नये.
• दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये.
• कडक किंवा विषम आसनावर जास्त वेळ बसू नये.
• मल निस्सारण करताना कुंथू नये.
• भूक नसताना केवळ चमचमीत पदार्थाच्या ओढीने खाणे,पचनशक्ती कमी असताना तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, विशेषत: डाळी, गहू व मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये.
• चहा, कॉफी आणि चटकदार पदार्थाचे सेवन टाळावे.

■ मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पाळावयाची पथ्ये (पथ्य म्हणजे हे करावे) ■

• रात्री झोपताना कपभर कोमट पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून प्यावे.
• पेरू, पपई, केळे, काकडी इत्यादी फळे रात्रीच्या जेवणानंतर खाण्याची सवय ठेवावी.
• जेवण वेळेवर करावे.
• तांदूळ, यव, ज्वारी, मूग, दुधी, पालक, सुरण, कुळीथ, अंजीर, आवळा, नारळ, दूध, ताक, लोणी, तूप, धने, जिरे, लिंबू, हळद इत्यादी पदार्थ खावे.
• जेवताना रोज मुळा खा.
• आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाव्यात.
• आठवड्यातून २ वेळा Sitz Bath घ्यावे. (पसरट भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात १० मिनिटे बसावे.)
• सुरण वाफवून केलेली भाजी आणि ताक नियमित आहारात घ्यावे.
• नियमित योग्य व्यायाम करावा.

          वरील ही सर्वसाधारण पथ्य पाळताना सुद्धा तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. कारण तुमच्या प्रकृतीनुसार यात बदल होऊ शकतो.

टीप – जरी कोणाला शस्त्रक्रिये द्वारे मुळव्याधापासून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी नोंदणीकृत डॉक्टरांच्याचं सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी. आणि क्षारसूत्रासारख्या आयुर्वेदीक उपचार पद्धतीचा वापर करायचा असेल तर नोंदणीकृत आयुर्वेदाचार्याकडूनच उपचार घ्यावा. आणि शस्त्रक्रिये नंतरही पथ्य पाळत राहावं कारण पथ्य न पाळल्यास हा आजार पुन्हा उद्भवू शकतो.

          मित्रांनो आपले आरोग्य आपल्याच हातात असते, ते आपल्या हातातून जावू देऊ नका. पुढची धोक्याची घंटा वेळेत ऐका आणि योग्य पथ्य पाळून निरोगी रहा.

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.


Wednesday, 25 April 2018

जवस

          “पथ्यातून आरोग्य”च्या मागच्या सदरात मी सर्वांना एक महत्वाचं पथ्य सांगितलं होत, “मनसोक्त हसणं”...... ते किती जणांनी पाळलं......? पाळलं गेलं नसेल तर आता लगेच सुरुवात करा आणि निरोगी रहा. आज मी तुम्हाला अजून एक पथ्य सांगणार आहे. ते आहे “जवस”.

          लहान असताना आम्ही भाचे कंपनी सुट्टीला मामाच्या गावी गेलो की आमची आजी आणि मामी दोघी मिळून खूप वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायच्या. आम्ही जायच्या आधी सगळी तयारी करून ठेवायच्या. त्यात एक तयारी आवर्जून असायची, ती म्हणजे “जवसाची चटणी”. आणि कोणाला आवडो न आवडो आमची आजी प्रत्येकाला जवसाची चटणी आग्रहाने वाढायचीच. मला तर जाम आवडायची. तशा जवसाच्या चटणीची चव मी अजून तरी खाल्ली नाही कधी. (बहुतेक प्रत्येकाची आजी अशीच चवदार चटणी करत असेल.) पण हेच जवस आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे आता मोठ झाल्यावर कळतंय. असे बरेच पदार्थ आपल्या आहारातून बाद झाले आहेत. परंतु असे पदार्थ जो पर्यंत आपल्या आहारात होते तोपर्यंत त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीराचा समतोल आपोआप साधला जात होता. आज मानवी आजारांचं प्रमाण या पदार्थांच्या कमतरतेमुळेच वाढलं आहे.

          जवसामध्ये Omega 3 Fatty acids असतात. ते दम्याच्या रुग्णांना त्रास कमी होण्यास मदत करतात आणि cholesterol level control ठेवून हृद्य विकार टाळता येऊ शकतात. जवसामध्ये fiber असल्यामुळे नियमित जवस खाल्याने बद्धकोष्ठता (Constipation) दूर होते आणि पोट साफ होण्यास मदत होते. यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असतात त्यामुळे जवस खाल्ले तर वृद्धापकाळात होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. वृद्ध रुग्णांमध्ये अशा तक्रारी सर्वसाधारणपणे असतातच. यात Antioxidants असल्यामुळे आपल लिव्हर सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. या जवसाचा महिलांमध्ये सुद्धा खूप छान परिणाम पाहायला मिळतो. यात Phytoestrogens नावाचे hormones असतात त्यामुळे महिलांना होणारा मासिक पाळीतील त्रास कमी करण्यास मदत होते. जवसामध्ये Lignans नावाचे Antioxidants असतात. जे महिला मध्ये होणाऱ्या स्तनाच्या cancerच्या शक्यतेपासून दूर ठेवण्यास मदत करतात. मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांना होणाऱ्या तक्रारी जवस खाल्याने टाळता येऊ शकतात. सोबतच यामध्ये Iron, Proteins आणि Vitamin B6 असल्यामुळे रक्ताच्या कमतरतेमध्ये सुद्धा जवस उपयुक्त ठरते. जवसामुळे शरीरातल्या द्रव पदार्थाचा समतोल टिकून राहण्यास मदत होते आणि त्यामुळे त्वचेची कांती वाढते. अशा प्रकारे जवस हे बहुगुणकारी आहे. त्यामुळे याचा वापर नियमित केला तर आजारांपासून दूर राहून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. स्वयंपाक तयार करतानाच जर खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावू शकतो. आपण बडीशोप सोबत जवस मिसळून ठेऊ शकतो आणि जेवण झालं की खाऊ शकतो. कोणत्याही मार्गाने जवस खा. पण अगदी अगत्याने खायला सुरु करा. तर आता खाणार ना जवस......?

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Sunday, 15 April 2018

“पथ्यातून आरोग्य”


          मी माझ्या Swapnadeep Hospital या official facebook Page वर आणि पथ्यातून आरोग्य या ब्लॉग page वर “पथ्यातून आरोग्य” हे सदर आज पासून सुरु करतोय. गत ८ वर्षातल्या वैद्यकीय व्यवसायात आलेले अनुभव, रुग्णांच्या शंकांचे निरसन, आजाराबद्दलचे समज गैरसमज या बद्दल सविस्तर माहिती मी या सदरातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज सर्व प्रथम मी पथ्य व अपथ्य या बद्दलची थोडीशी माहिती सांगतोय. “पथ्य” म्हणलं कि रुग्णांच्या कपाळावर आट्या पडतात कि डॉक्टर आता आपल्याला काय काय खाऊ नका हे सांगतील. पण खरतर पथ्य म्हणजे काय खावे आणि अपथ्य म्हणजे काय खाऊ नये असा याचा अर्थ असतो. रुग्णांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांच्या शरीरासाठी दैनंदिन आहारात आणि विहारात कोणते कोणते अनिवार्य बदल करावे लागतात ते म्हणजे पथ्य आणि अपथ्य. तुम्हाला वाचताना आश्चर्य वाटेल कि बरेचसे आजार फक्त पथ्य-अपथ्य पाळून सुद्धा बरे होऊ शकतात. पण आजकालच्या या गतिमान युगात लोकांना खूप घाई असते. लगेच आजारातून सुटका हवी असते. आपल्या शरीरात असणाऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेचा वापर आपण होऊच देत नाही. कालांतराने ही रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होत जाते आणि दुर्धर आजार निर्माण होऊ लागतात. फक्त पथ्य-अपथ्य पाळून आपण या रोगप्रतिकारक क्षमतेला बळ देऊ शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो.

          आज मी सर्वांसाठी एक महत्वाचं पथ्य सांगणार आहे. जे पथ्य सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी, निरोगी लोकांसाठी आणि ज्यांना कधी आजारीच पडायचं नाही अशा लोकांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे पथ्य कोणताही माणूस सहज पाळू शकतो आणि निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू शकतो. हे पथ्य आहे “निखळ हसणे”. पृथ्वीतलावरच्या इतर प्राण्यात आणि बुद्धीवादी मानव प्राण्यात जो फरक आहे तो म्हणजे “निखळ हसणे”. याचा वापर करून मनसोक्त हसत रहा आणि निरोगी आयुष्य जगत रहा.


डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.